जुनं ते...
जुनं ते...
"पुरानी चीज से cover नही हटाते हैं, ....जो अच्छा लगे उसे ज्यादा से ज्यादा चलाते हैं,हम हिंदुस्तानी कहलाते हैं"
रेडिओवर जाहिरात लागली होती. भारतीयांच्या 'झिजेपर्यंत वापरा' किंवा 'पुरवून पुरवून वापरा' ह्या मानसिकतेला भावेल असेच उत्पादन होते. जाहिरात गमतीशीर होतीच पण त्याहीपेक्षा त्यात तथ्य होते. मला हसूच आले....
आता आमच्याच घरात बघा ना, प्रत्येक गोष्टीला आपला असा इतिहास आहे. अगदी वाटी-चमच्यापासून ते fridge, dining table पर्यंत. Dining table आई-बाबांच्या लग्नानंतरचं, तर fridge माझ्या पहिल्या वाढदिवसाचा. पलंग-कपाटं २० वर्षांपूर्वी नवीत घरात घेतलेली. प्रत्येक वस्तूने आपआपले काम चोख बजावले आहे, इतके, की घरातील प्रत्येक व्यक्तीचे ह्या वस्तूंवर आपआपल्या परीने भावबंध जुळले आहेत.
नाविन्याचा आणि सौंदर्याचा (थोड्याफार प्रमाणात का होईना) ध्यास असलेल्या आम्हाला, कधी-कधी, 'पूरे घर के बदल डालूँगा' अशी हुक्की येते. बदलाचे वारे घरात वाहू लागते.
"कशाला, सध्या काम भागतय ना? शिवाय आजकालच्या वस्तू तकलादू असतात...पूर्वीसारख्या चोख वस्तू कुठे मिळाणार आजकाल??" - इति मातोश्री"
सध्या आहे ते इतकंही वाईट नाहीये, नाही का? उगाच कशाला जुनं देऊन नवीन आणायचं!" - आमच्या मनातला बारिक आवाज.
असं झालं की आमचं बदलाचं आवसान गळून पडतं आणि नेहेमीच्या सरावलेल्या वातावरणात आम्ही पुन्हा स्थिरस्थावर होतो.
'जुनं ते सोनं' किंवा 'झिजेपर्यंत वापरा'चे नकळत आमच्यावरही संस्कार झाले आहेत. तरीही चेष्टा-मस्करी करताना आम्ही मातोश्रींना ह्यावरून भरपूर हसतो. पण ह्याबद्दल खोलवर विचार केला की जाणवतं की दोष व्यक्तीचा नाहीये. तो काळच तसा होता, अभावाचा - पैशाच्या अभावाचा, बाजाराच्या अभावाचा, ई. त्यामुळे आहे त्यात निभावण्याची मनाला आपोआपच सवय लागली असावी. अभिरूची, सौंदर्यदृष्टी असल्या संकल्पना ही तेव्हा अस्तित्वात नव्हत्या.
पण आता जमाना बदलला आहे. आजचा काळ आहे सुबत्तेचा, सहज मिळणाऱ्या पैशाचा, सुखसोयींचा. 'पैशाचं काय करायचं' हा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे आणि 'खरेदी', हे बहुतांश लोकांना सापडलेलं सहज, सोप्पं उत्तर आहे. अनेक (नको असलेल्या?) वस्तूंची घरात रेलचेल दिसते. बऱ्याच वेळेला ह्या नवीन वस्तू, कार्यक्षम असलेल्या जुन्या वस्तू टाकून देऊन आणलेल्या असतात. आजकाल बाह्यरूपाला ही गुणवत्ते इतकेच(का थोडे जास्तीच?) महत्त्व प्राप्त झाले आहे.
---अकिरा.


nayana - मंगळ, 2007-07-31 21:11. जुनं ते
खुपच छान विषयाला हात घातलाय.
कुठल्याही भारतीयांच्या थेट मनाला भिडेल अशी एकच गोष्ट्, ती म्हणजे घरातील एखादी जुनी वस्तु ! आयुष्यात आलेल्या चढ-उताराची साक्श असलेली ही जुनी वस्तु सदैव आपल्या जवळ असावी ही प्रत्येकाची इच्छा असते.
काळ बदलतो पण मन बदलत नाही. जुन्यावर नव्याची झालर चढवली तर नवं आणखी उठून दिसतं...कारण त्याला आधार जुन्याचाच असतो....कारण जुन्या मनावर आधुनिकतेचा आरसा चढविला तरी त्यातल्या भावनांचा ओलावा पुसल्या जात नाही.